कोरोनाशी मुकाबल्यासाठी राज्यात संचारबंदी लागू

मुंबई– कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनांची सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , सर्वाना काळजीपोटीच मी सूचना देतो आहे. अनेकदा विनंती करूनही याचे पालन होत नसल्याने मला नाईलाजाने राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी जाहीर केले. दरम्यान आता राज्या अंतर्गत जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद असणार आहेत.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. कोरोनाचा प्रादूर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात जसे सुरू आहे तसे थैमान येथे सुरू होईल. एक लक्षात घ्या, कालचा जनता कर्फ्यूचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणार्‍या कर्मचार्‍यांसाठी होते. काल राज्यात 144 कलम लावले होते आता मला राज्यात संचारबंदी लावावी लागते आहे.
खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच ती सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने -आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहिल. असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील. प्रसंगी आशा वर्कर, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात ज्यांना प्रादूर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत. ही कठोर पाऊले केवळ जनतेच्या हितासाठी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!