पंढरपूर व परिसरातील १० गावात संचारबंदीबाबत जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आदेश

सोलापूर, दि. 29 : आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या काही गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 30) दुपारी दोन वाजल्यापासून ते गुरुवारी, दोन जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी म्हणजेच मनाई आदेश घोषित करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. पालखी किंवा पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येण्यास मनाई आदेश लागू केले आहेत.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून नऊ मानाच्या पालख्यांना 20 वारकर्‍यांसह पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत 144 कलमान्वये आदेश जारी केले आहेत.

आदेश खालील बाबींना लागू होणार नाही*

1.अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारे खाजगी/सरकारी रूग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने.

2.अ‍ॅम्ब्युलन्स सेवा आणि सारी, आयएलआय आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी/कर्मचारी.

3.जीवनाश्यक सेवेतील आस्थापना

4. मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक किंवा परवानाधारक व्यक्ती, प्रशासनाने परवानगी दिलेल्या पालख्या व सोहळे.

5. कर्तव्यावर असणारे महसूल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा विभागातील शासकीय अधिकारी/कर्मचारी.

6. पोलीस बंदोबस्तासाठी भोजनालय, पाणीपुरवठा सुविधा पुरवणार्‍या यंत्रणा.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!