पंढरीत संचारबंदी कालावधीत कोणीही कळस , नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी तसेच नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडू नये : प्रशासन

नागरिकांनी, भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे

अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे आवाहन

पंढरपूर, दि. 22 :- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वारी कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे, आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले आहे

माघी यात्रेच्या नियोजनाबाबत नवीन भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्र.प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक अरुण पवार आदी उपस्थित होते.

शहरात भाविकांची तसेच परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी दिनांक 22 फेब्रुवारीच्या रात्री 12.00 वाजलेपासून ते 23 फेब्रुवारीच्या रात्री 12.00 वाजेपर्यत (24 तास) पंढरपूर शहर व शहरालगतच्या 10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. नव्याने मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी तसेच मंदीर समितीने सर्व विधी पार पाडताना कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन पार पाडावेत. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्या अशा सुचना अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहही त्यांनी यावेळी केले.

माघ वारीत बाहेरील भाविक व नागरिक पंढरपूरात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्हास्तर, तालुकास्तर व शहरस्तरावर त्रिस्तरीय नाकाबंदी ठेवण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी विनाकारण फिरु नये. आषाढी, कार्तिक वारीत वारकरी साप्रंदायाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या प्रकारे सहकार्य असेच सहकार्य यावारीत करावे असेही अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेडे यांनी सांगितले. संचारबंदी कालावधी बाहेरील नागरिकांनी व भाविकांनी शहरात येऊ नये. यासाठी शहरमध्ये सुरक्षिततेसाठी पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, 100 पोलीस अधिकारी तसेच सुमारे 1500 पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ व होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाकाळात नाबरिकांनी मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर पाळावे असे आवाहनही श्री.झेंडे यांनी यावेळी केले.

यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी माघ वारीच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनेची सविस्तर माहिती दिली तर मंदीरसमितीचे कार्यकारी अधिकारी विठल जोशी यांनी मंदीर समिती मार्फत करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची माहिती यावेळी दिली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!