यंदा वीरच्या पाण्याने सोलापूर जिल्ह्यात नीरा व भीमा नद्या वाहत्या राहिल्या

पंढरपूर- भीमा खोर्‍यात यावर्षी पावसाचे प्रमाण थोडे कमी असल्याने उजनी धरण भरण्यास ऑगस्ट अखेरपर्यंत वाट पाहावी लागली आहे. हे धरण आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून यातून भीमेत विसर्ग होण्याची शक्यता आहे. मात्र मागील एक महिन्यापासून वीरच्या पाण्याने नीरा व भीमा या दोन्ही वाहत्या ठेवल्या आहेत. बुधवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी पंढरपूरमध्ये भीमा 8 हजार क्युसेकने वाहत होती. दरम्यान नीरा परिसरात पाऊस होताच वीरमधून पाणी सोडले जात असल्याने अजून ही तेथून विसर्ग सुरूच आहे.
नीरा खोर्‍यातील गुंजवणी, देवघर, भाटघर ,वीर व नाझरे हे सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. यामुळे वीरमध्ये पाठीमागील प्रकल्पातून पाणी आल्यावर तेथून ते पुढे नीरा नदीत सोडण्यात येत आहे. याचा फायदा नीरा व भीमा या दोन्ही नद्यांना होत आहे. त्या सतत वाहत्या राहिल्या आहेत. बुधवारी सकाळी वीरमधून 14 हजार क्युसेक पाणी सोडले गेले आहे. भाटघर प्रकल्पातून वीरमध्ये 3500 क्युसेकचा विसर्ग होत होता. वीरचे पाणी पाऊस व आवक पाहून कमी जास्त केले जात आहे. दरम्यान सोडण्यात येणार्‍या पाण्याने सोलापूर जिल्ह्यात नीरा व भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी संगमचा विसर्ग हा 3920 क्युसेकचा होता. मात्र पुन्हा वीरमधून पाणी सोडले गेले असल्याने तो वाढणार आहे. नीरा खोर्‍यातील धरणे मागील महिन्यातच हाऊसफुल्ल झाली होती व तेथून सतत पाणी सोडले गेले आहे व सध्या ही प्रक्रिया सुरूच आहे.
आता सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी प्रकल्पात ही क्षमतेने पाणी साठले आहे. तेथून ही पाण्याचे विसर्ग आता सुरू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!