विठ्ठल मंदिर 15 जुलैपर्यंत  बंदच, यंदा आषाढीचे उत्पन्न 16 लाख ₹

पंढरपूर,- कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 15 जुलैपर्यंतच बंदच असणार आहे. दरम्यान आषाढी यात्रा काळात भाविकांना पंढरीत येण्यास मनाई होती. यामुळे आषाढीच्या काळात मंदिराला केवळ 16 लाख 15 हजार 860 रूपये उत्पन्न मिळाले आहे.
श्री विठ्ठल मंदिर हे 17 मार्चपासून बंदच असल्याने याचा परिणाम समितीच्या उत्पन्नावर झाला आहे. आषाढीच्या काळात चार कोटी रूपयाहून अधिकचे उत्पन्न मंदिर समितीला मागील वर्षी मिळाले होते. मात्र यंदा मंदिर बंद असल्याने ऑनलाइन देणगी स्वरूपात 3 लाख 42 हजार 712 रूपये, ऑनलाइन अन्नछत्रासाठी कायम ठेव म्हणून 66 हजार, महानैवेद्य सहभाग योजनेसाइी तीस हजार तर एका कंपनीने अकरा लाख रूपयांची देणगी या काळात दिली आहे. यामुळे आषाढीला 16 लाख 15 हजार 860 रूपये उत्पन्न मिळाले आहे.
दरम्यान आषाढी यात्रेत परंपरेप्रमाणे देवाचा पलंग काढला जातो व विठ्ठल हा चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी उभा राहतो. यंदा जरी कोरोनामुळे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे बंद असले तरी सर्व परंपरा पाळल्या जात आहेत. याच अंतर्गत आता 9 जुलै गुुरूवार रोजी प्रक्षाळपूजा होणार असून यानंतर देवाचे सर्व राजोपचार सुरू होतील. शेजघरात देवाचा पलंग ठेवला जाईल. या दिवशीपासून पहाटेच्या नित्यपूजेपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंतचे सर्व नित्योपचार केले सुरू केले जातील.
दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे 15 जुलैपर्यंत दर्शनासाठी बंद असणार असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळविले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!