कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी खरेदीसाठी दुकानात गर्दी होवू न देण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन

पंढरपूर, दि. 02 : दिवाळी सण जवळ आल्याने खरेदीसाठी दुकानात नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी पालन करावे. तसेच दुकानात गर्दी होणार याची दक्षता घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

दिवाळी सणानिमित्त कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजने बाबत प्रांताधिकारी कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच शहरातील व्यापारी व व्यापारी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी ढोले म्हणाले, दिवाळी सणानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी दुकानात गर्दी होत असल्याने संबंधीत व्यापाऱ्यांनी आवश्यकती काळजी घ्यावी. दुकानात काम करणारे कामगारांनी मास्कचा वापर करावा तसेच त्यांची वेळोवळी आरोग्य तपासणी करावी. येणाऱ्या ग्राहकास सुरक्षित अंतर ठेवून वस्तूची देवाण घेवाण करावी. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे. मास्क लावले नसेल तर दुकान प्रवेश देऊ नये. शक्यतो ग्राहकांना माल घरपोच मिळेल याबाबत नियोजन करावे.असेही श्री ढोले यांनी सांगितले.

हिवाळ्याच्या वातावरणात मोठ्याप्रमाणात हवेचे प्रदूषण होत असते. नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी. फटाक्यामुळे ध्वनीप्रदुषण व वायूप्रदूषण होऊन लहान मुले, जेष्ठ तसेच श्वसनाचा आजार असणाऱ्या नागरिकांना यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यासाठी नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी असे आवाहनही श्री. ढोले यांनी यावेळी केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांबरोबच परिसरातील साखर कारखाने सुरु झाल्याने ऊसतोड कामगारांचीही गर्दी वाढत आहे. दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्राहकांना शक्यतो घरपोच माल द्यावा यासाठी व्हॉटस्ॲप व इतर इंटरनेट सुविधेचा वापर करावा. जे दुकानदार प्रशानाच्या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेतील व इतर ठिकाणी माल वाहतुकीसाठी अवजड वाहनांना सकाळी अर्धातास व दुपारी अर्धातास असा एक तासाचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त सुधारीत वेळेनुसार सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 पर्यंतची अवजड वाहनांना वेळ देण्यात आली आहे. यावेळेतच व्यापाऱ्यांनी आपल्या वस्तूंची चढ-उतार करावा. तसेच या वाहनांमुळे वाहुकीस अडथळा येवून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना श्री.कदम यांनी यावेळी दिल्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!