वीर धरणातून ३२ हजार ४५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पंढरपूर: (दि.१४):- नीरा नदी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नीरा नदी पात्रामध्ये ३२ हजार ४५९ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नीरा व भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.
मंगळवार (दि.१४) पहाटे ४.०० वाजता वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये ३२हजार ४५९ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. तसेच वीर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू असल्याने विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असेही तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.